आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील, शारीरिक हानी होईल ती वेगळीच.
शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून दोघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. अतिथंड देशात सूर्यकिरणं अंगावर न पडल्यामुळे जीवनसत्व डीची कमतरता तेथील लोकांमध्ये असते. सकाळी नऊच्या आत अंगावर सूर्यकिरणं पडावीत म्हणतात, पण तेव्हा ऊन नसते, मग हे लोक दुपारचे ऊन अंगावर घेतात.
