गंभीर
ना.रा.खराद
आजच्या काळात माणसे चेहऱ्यावरील हास्य
गमावून बसले आहेत.जिकडे तिकडे गंभीर
चेहऱ्याची माणसे दिसत आहेत.माणसे माणसांकडे अकारण रागाने बघत आहेत.
श्रीमंत लोक, अधिकारी,विद्वान यांना तर गंभीरतेचा शापच आहे.हसणारी माणसे यांच्याजवळ गेली की गंभीर होतात.मनुष्य असा गंभीर का असतो किंवा होतो याची कारणे शोधली पाहिजेत.थोडेसे हसमुख असले तर काय बिघडते.घोड्यावरुन वरात काढलेला नवरदेव गंभीर असते पटते का?
विनोदाची पुस्तके विकणारा बुकस्टालवाला देखील गंभीर असतो.गुलाबजामून पाकात
टाकणारा स्वयंपाकी सश्रम कारावास झाल्यासारखा गंभीर असतो.नवरीसोबत चालणाऱ्या करवल्या इतक्या गंभीरपणे चालतात की जशा अत्यंयात्रेत .हे गांभीर्य येते
कोठून आणि कशासाठी?
स्विट मार्ट मधला विक्रेता कढी प्याल्यासारखा
चेहरा करुन बसलेला असतो.एखाद्या आफिसमध्ये गेले की खुर्चीवर एखाद्या पुतळ्यासारखा तो अधिकारी बसलेला असतो.
थोडा हसरा चेहरा केला तर काही नुकसान
होणार आहे का?
बसमध्ये तिकिट पाडणारा तो कंडक्टर ,त्याला
गंभीर असण्याची काय गरज? गाडी सरकारी,बसणारे लोक,स्वत: फूकट प्रवास
पुन्हा लोक साहेब म्हणतात , तरीही हा
गंभीरच.
एखाद्या शाळेचा हेडमास्तर ,किती आनंदी
असायला पाहिजे.निरागस बालकांना सोबत
रहाण्याचे अहोभाग्य लाभलेले परंतु गंभीर.
जसे एस.एस.कोडमध्ये हसण्यावर बंदी आहे.
जिकडे तिकडे ही पडक्या , गंभीर चेहऱ्याची
माणसे बघितली की माणसांपासून दूर रहावे
वाटते.घरी एखादा उत्सव असतो तेव्हा तरी
गंभीर राहू नये.तोंडात पेढा भरला तरी शेण
खाल्ल्यासारखा चेहरा करतात.उच्च शिक्षित
लोक तर जाणूनबुजून गंभीर राहतात.जाड भिंगाचा चष्मा,पडलेले टक्कल , गंभीरपणाचा
आव आणतात.थोडे हसरे, खेळकर, मनमोकळे असायला काय हरकत आहे.
मुलगी बघायला गेले की इतके गंभीर वातावरण बनवतात.अधिकारी पदाची मुलाखत घेतल्यासम गंभीर होतात.नोटांचे बंडल मोजणारे सेठ लोक तरी हसायला हवेत.
ते तर नोटा अशा मोजतात, जसे रद्दी जोडत आहेत.
गुंड तर कधीच हसत नाही.हसरा चेहरा असेल
तर लोक भिणार नाहीत,असे त्यांना वाटते.
अंगरक्षक तर इतके गंभीर असतात, माणसे
आहेत की पुतळे तेच कळत नाही.दाखवायला
आणलेली मुलगी तर इतकी गंभीर असते की
जसे कापायला आणले.आनंदाच्या सोहळ्यात
माणसे इतकी गंभीर असतात की ती शोकसभा वाटायला लागते.
पोलिस खात्यातील लोक तर गंभीरतेचा कळस आहे.अकारण डाफरल्यासारखे बघतात.अनोळखी स्त्रिया तर मुद्दाम गंभीर
चेहरा करतात.पाचशे किलोमीटर सोबत एका
सीटवर बसणारी माणसे एकमेकांशी बोलत
नाहीत.बोलावं असे त्यांचे चेहरे नाहीत.
घरी स्वयंपाक करणाऱ्या बायका देखील हसऱ्या चेहऱ्याने स्वयंपाक करत नाही, कामवाली बाईसारखा गंभीर चेहरा असतो.
आनंदी आणि उत्साही मनुष्य बावळट असतो
असा काही समज पसरलेला आहे.गंभीरता हा
एक रोग आहे, परंतु तो सर्वांना असल्याने तो
आरोग्य वाटू लागला आहे.
सगळीच माणसे एस.बी.आय मधल्या कर्मचाऱ्यांसारखी गंभीर दिसत आहेत.
फूले विकणारा जर प्रफुल्लित रहात नसेल तर धंदा खोटाच.सोन्याचे दुकानदार वीट भट्टीवर
असल्यासारखे वागतात.सोने चमकते परंतु
दुकानदार नाही.
थोडे सैल व्हा,ताठरपणा कमी करा,भेटणाऱ्या
माणसांशी मोकळेपणाने बोला.तुम्ही देखील मनुष्य आहात हे दाखवून द्या.
असे कराल तर तुम्ही आनंदी व्हाल आणि ते देखील.
